राजकीय पक्षांच्या आयुष्यात विविध टप्पे येतच असतात. त्यापैकी काहींचे दीर्घ टप्प्यांचे, दीर्घ पल्ल्याचे परिणाम होतात. १५ वर्षांपूर्वी २००५मध्ये आजच्याच दिवशी (१८ डिसेंबर) राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व महाराष्ट्राच्या राजकारणाने वेगळेच वळण घेतले.
शिवसेनेतून त्यापूर्वी गणेश नाईक, छगन भुजबळ असे पहिल्या-दुसऱ्या फेरीतील नेते बाहेर पडले होते; पण ठाकरे कुटुंबातील कुणी हे धाडस करण्याची ही पहिलीच वेळ.
राज विद्यार्थी सेनेचे प्रमुख होते व ही युवाशक्ती हेच राज यांचे शक्तिस्थान राहिले. पुढे दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. त्यानंतरचा राज यांचा प्रवास सर्वश्रुतच आहे.
तेव्हापासून मनसेने लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या प्रत्येकी दोन-तीन निवडणुका पाहिल्या. त्यात आधी यश व नंतर कमालीचे अपयश पचवले.
परंतु तरीही मनसे आजही महाराष्ट्रात ‘फोर्स’ म्हणून उभी आहे. कोणतीही राजकीय शक्ती एक-दोन पराभवांनी संपत नाही. ती वेगवेगळ्या रूपांत जिवंत राहतेच. अर्थात त्यासाठी काळाच्या गरजेप्रमाणे स्वत:मध्ये बदल करावे लागतात. ‘मनसे’ने तसेच स्वत:ला बदललेही आहे. आता राज हिंदुत्वाकडे झुकू लागले आहेत. हा बदल लक्षणीय व दीर्घकालीन परिणाम करणारा आहे.
आता महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. आता शिवसेना सत्तेवर आहे. ज्यांच्याशी आजवर वैर जपले, त्या काँग्रेसशी सोयरीक करून सत्ता स्थापन झाली, त्यालाही आता वर्ष उलटले. आता येणाऱ्या महापालिका व नंतरच्या सार्वत्रिक निवडणुका या लिटमस परीक्षा असणार. त्यात मनसे कशी उत्तीर्ण होते, ते महत्त्वाचे.
मराठी माणूस, त्यांच्या समस्या व महाराष्ट्र जोपर्यंत अस्तित्वात आहे, तोवर राज यांची मनसे ही शक्ती राहणारच, हे राजकीय सत्य आहे. तिचे नाव व ध्वज काहीही असेल.
- भारतकुमार राऊत